Saturday, September 15, 2012

थोडसं जगुन.....




ह्या गर्दीत आपण...
अगदी असेच हरवायचो...
हक्काचं निळशार आभाळ..
एकमेकांच्या डोळ्यांत शोधायचो..
ह्या गर्दीत आपण
अगदी असेच हरवायचो

हसायचो रुसायचो...
क्वचित कधीतरी भांडायचो...
भांडुन भांडुन दमलो की..
स्वतःवरच रागवायचो
ह्या गर्दीत आपण
अगदी सहजतेने हरवायचो..

घ्यायचो आणाभाका सोबतीच्या
भविष्याची सप्तरंगी स्वप्ने रंगवायचो
तु व्हायचीस नकळतच गुंग
मी तुझी थट्टा उडवुन जायचो
ह्या गर्दीत आपण
अगदी सहजतेने हरवायचो..

भर पावसाच्या साक्षीने..भिजताना...
अगदी एकरुप होऊन जायचो...
त्या मावळतीच्या सुर्याला पाहायला...
त्या आडवळणाच्या नदीपाशी जायचो...
त्या गर्दीतही आपण...
काही क्षण वेगळे वाटायचो...

तोच तो किनारा...
अन तिची ती अल्लड नक्षी...
तिच्या सादेला प्रतिसाद देणारा..
तोच कुठलातरी चुकार पक्षी...
तोच मी...अन तीच तु...
सारं काही तेच जुनं...
अगदी नव्यानेच रोज अनुभवायचो...

ह्या एकांतात क्षणभर का होईना...
आपण थोडसं जगुन घ्यायचो...
बस.....थोडसं जगुन घ्यायचो...


ओंकार

Monday, July 2, 2012

कालचा पाऊस..

तोच उनाड वारा..
तिच्या पदरामध्ये गुंतुन गेला...
तुझ्या धुंद श्वासांमध्ये...
बहुदा तोही रंगुन गेला...
माझे प्रेम...तुझ्यावरच्या कविता...
तुला सांगुन गेला...
मी ठेवलेल्या जपुन उरात..पाऊलखुणा..
तो क्षणार्धात ताज्या करुन गेला
कालचा पाऊस...खरचं..बरेच काही देऊन गेला...

खिडकी बाहेर..रातकिड्यांची अखंड मैफील..
आकाशात सौदामिनीची तिला साथ...
अबोल..अनामिक शब्द ..ओठांआड लपलेले...
अन...मदहोश होत चाललेली...रात...
सगळं काही....धुंद ...बेहोश....
तुझ्या नजरेच्या जादुत..बदुहा...झिंगलेलं”..
एवढं सगळं क्षणार्धात देऊन गेला...
कालचा पाऊस..सखे बरेच काही देऊन गेला...

त्या भिजलेल्या पावसाने...
ओली झालेली माझी प्रत्येक कविता...
अन ओल्याचिंब कवितांत
नव्याने उमललेलं माझं मन...
मनात पुन्हा नव्यानेच दाटलेली तु...
तुझ्यासाठी बेचैन..झालेला हळवा क्षण
त्या बेजोड सुरावटीतही नव्याने..
प्रितीचा सुर मिसळुन गेला...
कालचा पाऊस... बरेच काही देऊन गेला...

खिडकीआडुन..बाहेर निसर्गाचं 
नवसौंदर्य अनुभवणारा मी...
अन..पाठीआडुन नकळतच बिलगलेली तु...
तुझ्या हळुवार स्पर्शात गुंतलेला मी..
त्या क्षणांना डोळ्यांत नकळतच जपणारी तु...
भावनांना शब्दांत गुंतण्याचे कसब देऊन गेला...
कालचा पाऊस खरचं..तुला मला जवळ आणुन गेला

ओंकार


Wednesday, June 6, 2012

तुझीच कविता.....


तु रुसायचं ,अकारणच भांडायचं
हसायचं ,एकमेकांना समजवायचं
आपलं नातं अगदी असचं जपायचं
सोबतीने..अगदी सारं शिकायचं


एकमेकांसाठी जगत राहायचं
स्वप्नांना...मुर्त रुप दयायचं
स्वप्नांच्या दुनियेत रंगुन जायचं
आयुष्याचं पान  नव्यानेच लिहायचं


पानावर...असेल नविन अध्याय...
पावलाला लाभेल पुर्णत्वाचा न्याय...
श्वासांगणीक ध्येयाच्या  जवळ जायचं
नव्या जगाला उमेदीने सामोरं जायचं


तु असचं हसत राहायचं  
मी तुला बघत राहायचं
आयुष्यातलं चुकार वळण
सहजच मागे टाकायचं
अन मग तुझ्या अदांना
मी सहज..कवितांत गुंतवुन टाकायचं


ओंकार


Tuesday, May 15, 2012

नसतेस तु घरी जेंव्हा



सये नसतेस तु,
घरी जेंव्हा
आजकाल
खरचं काहीच सुचत नाही...
तुझ्या आठवांशिवाय...
विचारांमध्ये
इतर काहीच डोकावत नाही
मी घरी आल्यावर,
तुझं ते हळुवार हसणं
गालातल्या गालात
तुझं ते लाडीक लाजणं
नजरेच्या कोनाड्यातुन
अलगद बघणं
अन..माझं ते
अगदी सर्व विसरणं
तु नसताना
ह्यातलं काहीच घडत नाही
शब्द माझे कातर होतात....
उगाच मनास पंख देतात....
वेळी-अवेळी तुझ्यापाशी...
माझ्या मनाला खेचुन नेतात...
असे होऊ नये...असंही
कधीच मनाला वाटत नाही...
सये तु नसताना घरी....
आजकाल.......
खरोखरचं करमत नाही

ओंकार

Friday, February 10, 2012

"सई"ची कविता...



आजकाल "सई"ची चर्चा...
जागोजागी होऊ लागलीय...
कधी नव्हे ती माझ्या चक्क
कवितांतही दिसु लागेलीय

माझ्या कवितांतली माझी "सई"
बरेचदा माझ्याच मनात असते...
अन तिच्यावरच्या कविता वाचुन...
एकांतात मनसोक्त हसत असते

"सई" तु समोर आलीस..की
माझेच शब्द माझ्यावर रुसतात
नसतेस समोर तु जेंव्हा जेंव्हा..
तेंव्हा श्रावणसरींसम ओघळतात...

"सई" रुप तुझे चंद्रासम..
अन चांदण्यासम दुधाळ काया...
तुझा शोध न घेता मी...
जन्म खुळे जाईल वाया...

त्या आकाशाच्या निळाईने
सागरापाशी..ओंजळ पसरावी...
माझी "सई" मला त्या..
उगवतीच्या किरणात सापडावी

ओंकार

Tuesday, February 7, 2012

"सये"...पुन्हा तु नसताना

शब्द माझे अपुरे होते...
आज सये तु नसताना...
माझाच "मी" अधुराच...
"सये"...पुन्हा तु नसताना

फुलतो निशीगंध सये..
वेड्यागत तु असताना...
रुस ला तो आज माझ्यावर
"सये"...पुन्हा तु नसताना

खिळतो तो चंद्रमा नभांत..
तु चांदण्यांत त्या भिजताना..
टाळतो..वाट माझ्या गावाची..
"सये"...पुन्हा तु नसताना

घुटमळतो पावलांत काळ सये
मिठीत तु माझ्या असताना..
भिरभिरतो पारवा वाट पाहाता..
"सये"...पुन्हा तु नसताना

याद तुझी..खुणावणारे...
साद तुझी..बेधुंद करणारी..
सारं काही...आठवतेय..
अगदी ...अगदी ठळकपणे..
अन जाणवतेय...ते..
तुझ्या माझ्यातले अंतर...
"वाढलेलं"....किंवा वाढवलेलं
"सये"...पुन्हा तु नसताना

ओंकार

Wednesday, February 1, 2012

बहुदा...राहुनच गेलं ..



ठरवले होतं आपण
स्वप्नांना मुर्त रुप द्यायचं
अनेकानेक रंगानी..
आयुष्य उजळुन टाकायचं
पण..स्वप्नांना बांधायचं.
बहुदा...राहुनच गेलं ..

तुला दिलेलं प्रत्येक वचन
माझे श्वास त्याला तारण होते
श्वासांच्या ध्यासात अडकुन
मी मात्र स्वतःलाच फसवले होतं
हाती उरलेले श्वास मोजण्याचं
बहुदा...राहुनच गेलं ..

तुझ्या अदांना शब्दांत गुंतवत
मी कविता करतच होतो...
त्याच कवितांच्या मैफीलीत
स्वतःला मात्र विसरत होतो..
मैफीलीत भैरवी करण्याचे
बहुदा...राहुनच गेलं ..

श्वासही सरले..ध्यासही सरले...
हातात फुटके स्वप्न उरले...
डोळ्यांत खुपणारे...बोचणारे
भंगलेल्या स्वप्नांना वेचताना
थोडं स्वतःसाठी जगायचं
बहुदा...राहुनच गेलं ..

ओंकार

Monday, January 30, 2012

तिला कधीच जाणवलं नाही

मी सहजचं हसत होतं..
सा-यांनाच खुश दिसत होतो..
पण तिच्यापायीचे ते माझं
मनसोक्त बरसणं...
तिला कधी जाणवलचं नाही...

मी लिहीत होतो..कविता..
रंगवत होतो तिला शब्दांनी..
पण त्या शब्दांचं इंद्रधनु..
उघड्या डोळ्यांनीही
तिला कधी गवसलचं नाही

मी उडुन गेलो..आठवांतुनही..
असाच सहज..निमुटपणे..
पण त्या मागे सांडलेल्या
दर्पाचं कारण..
तिला कधीच उमगलचं नाही

मी दिव्यासम..झगडत होतो..
पांढरा धुर मागे सोडत होतो..
पण ते तडफडणं..तिच्यापायी..
त्या वातीलाही...
कधीच कसं समजलचं नाही

मी...हरलो...मी संपलो..
मी विरलो...बेपर्वा ठरलो..
कवितांत ठासुन भरलेलं प्रेम..
प्रत्यक्षात मात्र
कधीच डोळयांत दिसलचं नाही
ओंकार

Tuesday, January 17, 2012

तिमीरसुक्त


दिशा कोंदट कोंदट...
नभ साचले कित्तेक...
नाही किरणाची आशा..
चिर उभी काळजात...

एक पारवा तो खुळा..
आज गातो पारावर..
धरे साल ती काळाची..
पुन्हा जुन्या घावावर.

सल खोल ती मनाची....
काही चुकार क्षणांची..
दावी भिती तु मनाला..
का रे उगा...अंधाराची

सांज ढळाया लागली...
रात खुलुनी सजली
न जाणे कोणास कशी..
आज चाहुल तुझी लागली.

नवे तिमीराचे सुक्त...
सारे प्रकाशाचे भक्त...
खोल गोठले ते रक्त.?
लढं श्वासांशी तु फक्त

ओंकार....

Monday, January 16, 2012

नातं तुझी नी माझं




तु माझ्याशी बोलावं..
मी तुझ्याशी बोलावं...
प्रितीचे गोड तराणे....
हलकेच सजुन यावे..


मी असचं तुला पाहावं..
नजरेत भरुन घ्यावं
त्या प्रेमाच्या वर्षावात..
आभाळानेही भिजावं


मी तुला मिठीत घ्यावं..
तु येता येता लाजावं..
तु लाजताच आकाशातुन.
चंद्रबिंब कोसळुन जावं


दिलेलं चाफ्याचं फुल..
हलकेच केसांत माळावं
दर्पाने मोहरुन जाऊन...
रानात केवड्याने बहरावं


मी तुला पाहात राहावं
तु बटांआडुन लपत राहावं
आपलं नातं हे सखी..
जन्मोजन्मी राहावं


मी शब्दांशी खेळत राहावं
तुही प्रतिसाद देत राहावं
शब्द शब्दांच्या इंद्रधनुसम..
आपलं भेटणं सखे असावं


असचं आपलं नातं असावं
असचं आपलं नातं असावं.
कधी कोवळं उन हवंहवसं..
कधी ढळणारी ती सांज असावं


ओंकार....

Monday, January 9, 2012

शम्मा

इश्क विश्क प्यार व्यार..
है ये सब सब बेकार की बातें..
उन बेवफाकें यादोंमे बितती है..
इन दिलजलें आशिकोंकी राते
खुदको न इसतरहा जला लेना..
की शम्माभी शायद शरमा जाए..
बरबाद हो चुके न जाने कितने जुगनु..
रुह हर एक की हिसाब न मांगने आए
अंजान राहोंपर न यु भटकना..

न जाने कौनसी मोड क्या दिखा जाये..
भागते रहते हो दुर शम्मासे तुम बेवफा..
राह तुम्हारी कही उनसे न उलझ जाए

ओंकार

तिची माझी भेट



तुला खुणावता तो मंद गंध
खुणावता वेडावता मोग-याचा..
अन तोच तुझा भास..आभास..
पुनश्छ ध्यास लावी जगण्याचा

बस एकदा तिनं हसावं..
फक्त एकदा तिनं हसावं..
भरलं आभाळ चांदण्याचं
क्षणार्धात माझ्या कवेत यावं

तो घरामागचा गुलमोहोर..
आजकाल बहरत नाही..
तुझ्या वाट बदलुन जाण्याचे
कारण त्यालाही कळत नाही

स्वप्नांतल्या वाटांना..आज
नव्यानेच तिचीच याद यावी..
अन बागेतल्या त्या कळ्यांनी..
तिला आता  कुठवर साद द्यावी

गावाबाहेरच्या त्याच निसरड्या वाटा..
जेथुनी कहाणी आपली सजली होती...
रातराणी आज तुझी बघताना वाट..
खरचं बघ ना..आज दमली होती.

तिची माझी भेट ठरलेली कधीचीच
भेटल्यावर तिचीही घाईही नेहमीचीच
ते तिचे नेहमीचे बहाणे..घरी परतण्याचे..
सांगावे तिला कोणीतरी..सखे तुझ्या
पैंजणात सजलेत माझे श्वास जगण्याचे

असचं काहीसं घडावं

असचं काहीसं घडावं
थोडं थोडं का होईना
तिला माझ्या मनातलं
अगदी सगळं कळावं
खरचं असंच काही घडावं

मी टाळावं बोलायला..
तिला सगळं काही कळावं
अन न बोलताचं दोघांचं
मन नेहमीच जुळून यावं
खरचं असंच काही घडावं

उगाचं लाजतचं..तिनं
हलकेच मिठीत शिरावं
मिठीत शिरताना मनाचं
भिरभिरणारं मोरपिस व्हावं
खरचं असंच काही घडावं

एकदा तरी का होईना.
तिनं माझ्याशी भांडावं
भांडुन झालं मनसोक्त की..
उगाच स्वतःवरच रुसावं
खरचं असंच काही घडावं

तिच्यावरचं प्रेम कवितांतुन
माझ्या नकळतचं तिला कळावं
कळल्यावर तिला ते सारं..
तिनेही मनसोक्त हसावं
खरचं असंच काही घडावं

निदान एकदातरी घडावं
निदान एकदातरी घडावं
माझ्या सखीच्या नात्याला...
काळानेही घट्ट करुन जावं
खरचं असंच काही घडावं

ओंकार

Sunday, January 8, 2012

संभवामी युगे युगे

भगवतगिता वाचत असताना एक नविन विचार मनास स्पर्शुन गेला की कान्हा असो वा कोदंडधारी प्रभु राम..दोन्ही अवतारात भगवंताने एका सामान्य माणसाला भोगावे लागेल ते सर्व भोग भोगले...अगदी आनंदाचे वा पार दुःखाचे क्षणही झेलले...जेंव्हा कुरुक्षेत्री युध्द सुरु होते तेंव्हा समोर आपले नातलग पाहुन अर्जुन काही क्षण कोलमडला..त्याने धनुष्य खाली ठेवले. त्यावेळी रथाचे सारथ्य करणा-या त्या युगंधराने पार्थाला श्रेष्ठ भगवतगिता सांगीतली..पण त्या मनुष्ययोनीत बहुदा काही क्षण कान्हाही निराश नक्कीच झाला असावा निदान दोन क्षणांपुरता का होईना कारण समोर उभे ठाकलेले जसे अर्जुनाचे गुरु..नातलग होते..तसेच ते कान्हाचेही होतेच की...तर त्या दोन क्षणांत बहुदा काय द्वंद उभे ठाकले असेल ते मांडण्याचा एक फक्त प्रयत्न कारण तसाही कान्हा हा सर्वाच्या पलीकडचा...अनंत असा..त्याचा आदी अन अंत कोणासही ठाऊक नाही...
चुकभुल दयावी ...
ओंकार

संभवामी युगे युगे

केवळ...काहुर..मनात..
विचारांच...प्रश्नांच...कश्यासाठी?...
अन मुख्य म्हणजे कोणासाठी..
सारेच रक्ताचेच भाऊबंध...
अगदी माझ्यासारखेच रक्तामांसाचे..
ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो...
वाढलो..शिकलो...तेच ...तेच सर्व..
हा धर्म..की अधर्म..का? कळतच नाहीय..
धर्म अधर्माचा जालीम बुरखा.
चेह-यावर लावुन..
बेमालुम गर्दीत मिसळणारा..
मी युगा-युगांचा..युगंधर..
क्षणार्धात..कफल्लक झालेला...ह्या सा-याने...
काहीच कळत नाही..
जो लढतोय..तोच मी..
अन ज्याच्याशी लढतोय..लढणार आहे..
तोही माझाच मी..
सारे माझेच... अन सा-यांत मी..
सुन्न झालेलं डोकं.. दुमदुमणारी रणदुदंभी..
गर्जणारे शंख..अन सोबतच
नजरेस धुमील करणारा तो धुरळा..
रथचक्रांमुळे... उमटलेल्या रेषांसमवेतच...
अधोरेखीत झालेले..काही प्रश्न..
युध्द कश्यासाठी..? काय सिध्द करण्यासाठी..?
श्रेष्ठत्व? की.....
कश्याचेच उत्तर नाही....
पाठी हा पार्थ..अन समोर राधेय..
दोन्ही माझेच...प्राणांहुनही प्रिय..
एक 
ब्राह्मणवेशात
रानोवनी भटकलेला...
एक सुतपुत्र म्हणुन
आजन्म हिणवले गेलेला...
मी ही तसाच नाही का?
गोपाळ..गोकुळातला...
हताशपणे..हा अधर्मरुपी..अंधारात
अनाहुत हरवत चाललेला.. सुर्य..
सुन्न झालेल्या डोक्यांतुन..
ऐकु आलेले उत्तर….

"यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत,
अभ्युथानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् |

परित्राणाय साधुनाम
विनाशाय च: दुष्कृताम,
धर्मं संस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे
संभवामी युगे युगे

ओंकार

दरवळता गंध

मी न सांगताच..बरेचसं
तिला बरेचदा कळत होतं
बहुदा माझ्या कवितांत ..
तिचं माझं मन एकांतात
एकमेकांशी बोलत होतं
शब्द कधीचेच जुळले होते..
हेवेदावे पाठीमागेच सरले होते..
प्रेम अन प्रेम बस काय ते..
कवितांमध्ये आजकाल उरले होते
ती आली आयुष्यात अन..
सारं काही बदलुन गेले..
श्वासांचे गणीत देखील माझे..
काही क्षणांपुरते चुकुन गेलं
आजकाल उरलाय..फक्त
दोन मनांचा अनामिक बंध..
अन प्रत्येक कवितेंत माझ्या..
तिनं माळलेल्या
गज-याचा दरवळता गंध

ओंकार

Monday, January 2, 2012

भर पहाटे




त्याच पायवाटेवर..
अडचणीच्या.
निस्तेज..काळवंडुन
पडलेला मी..
भर पहाटे कोसळणा-या
दवाची वाट बघत...
पुन्हा एकदा चमकण्यासाठी..
ठाऊकच नाही…
ती चकाकी..शेवटची वेळ
कधी नजरेला पडली..
अन त्यानंतर,
सुरु झालेला संघर्ष
ओळख शोधण्याचा..
कोणी बोले मला कोळसा..
कुणी बोले
माखला चिखल जरासा..
ठाऊकच नाही कोणाला...
उरावर माझ्या आहे ठसा..
त्या राधेचा...
अन मिरेचाही..
विरक्त प्रेम...आतुरलेले...
अन निर्विकार प्रेम...
बहरुन आलेले..
दोन्ही 
पार जवळुन पाहीलेय मी..
झुरणं दोघींचेही... 
कान्हापायी...
तोच निळा कान्हा...
जणु साक्षात सुर्यबिंब 
निळं उत्तरीय लेवुन 
धरणीवर अवतरीत झालेलं..
अन तीच ती खुळी राधा...
दोघांच्या प्रेमरसात
आकंठ न्हालेला मी...
अन दुस-या बाजुस..
ती मीरा..राजपद सोडुन 
संन्यासी झालेली...
त्याच निळ्या कान्हापायी..
अन तिच्या भक्तीत भिजुन
शेंदुर लेपुन..
देवपदास गेलेला मी.
तोच तो दगड...
अडगळीतला...
विस्मरणात गेलेला...
भर पहाटे कोसळणा-या
दवाची वाट बघत...


ओंकार