Thursday, March 15, 2007

उनाड कविता





वर सुर्य आहे तापला
खाली धरती तापली,
सारे उदास उदास
एक माय ती रडली.

घोटभर पाण्यासाठी
ती गावभर हिंडली,
श्रीमंताच्या दारापाशी
दोन क्षण ति थांबली.

आठवण बाळाची
तिच्या मनात दाटली,
ज्याला पाणी पाजण्यासाठी
ति गावभर हिंडली.

त्यांच्या घरात
सदाच शिमगा,
गरीबांच्या घरी मात्र
आहे फक्त वणवा.

तयांचा घरात
भरलेले माठ
तयांच्या विहीरी
भरल्या काठोकाठ,

बाळे तयांची
खेळती पाण्यासंगी
माझा तान्हुल्याची
लाही होत असेल् अंगी.

नाही मोल तयांना
त्या घोटभर पाण्याचे
तिच्या कानात गुंजले
रडणे पोटच्या गोळ्याचे,

तयांच्या शेतात पाटातुन
वाहे पाणी
तिच्या बाळाच्या
डोळ्यांत नाही पाणी.

सारया विहीरी आटल्या
नदी नालेही आटले
पावसाची वाट पाहत
डोळे आभाळी लागले,

आभाळात नाही पाणी,
धरणीत नाही पाणी,
नाही कुठेही बाकी पाणी
मग डोळ्यांतुन का वाहे पाणी

धिर करुन ति आई
त्या आईला बोलली,
तुमच्या सारखाच
माझाही कान्हा निजला आहे घरी.

थोडेसे तरी पाणी
मला मिळेल कागे माये,
पाण्यासाठी माझा राजा
माझी घरी वाट पाहे.

थोडेसे पाणी घेऊन
ति खुशीत चालली,
उचलुन घेण्यासाठी बाळा
ति माय आज धावली.

घरी जाऊन तिने
बाळास पुसले
बाळराज माझे आज गप्प का बैसले,
काय सांगेल तो तिला निरागस तो बाळ
आईच्या मायेने आज भारावुन गेला होत एक काळ.

No comments:

Post a Comment